आजकाल राजगड हद्दीत “ये पैसा बोलता है… और सब चलता है.
आग लाव्या : म्हणे आजकाल राजगड हद्दीत “ये पैसा बोलता है… और सब चलता है.” एकेकाळी शिस्त, कायदा आणि लोकसेवा यासाठी ओळख मिळवलेले पोलिस ठाणे आज संशयाच्या सावलीत उभं आहे. नागरीकांचे प्रश्न, तक्रारी, अन्याय… या सगळ्यांना कदाचित भीती वाटते — कारण इथे निर्णय देतो तो कायदा नाही, तर खणखणणारा पैसा.
पोलिस ठाण्यात एक नामांकित “कलेक्टर”प्रमाणे वागणारा हवालदार अंगावर टाकलेला “वरिष्ठपणा” जपतोय. नावावर हवालदार — पण धंदा, रोखठोक व्यवहार आणि खुर्चीवरीून चालणारी सत्ता पाहिली तर जणू संपूर्ण व्यवस्थेचा तोच सरकार. वरिष्ठांना हाजी, नेत्यांना वंदन आणि बाहेर दबलेल्या लोकांमधून धन गोळा… एवढं झाल्यानंतर त्याची चलती व्हायची नाही तर कोणाची?
जिथे पैशाच्या बदल्यात फाईल हलते, तक्रार लिहिली जाते, गुन्हा नोंदवला जातो किंवा मिटवला जातो — तिथे व्यवस्था रोगट आहेच.
खेड-शिवापूर परिसर तर आणखी एक कहाणी सांगतो. इथे मटका, जुगार, बेकायदेशीर मद्य आणि वैश्या व्यवसाय यांच्या अड्ड्यांना छप्परच मिळतंय. साधा नागरिक एखाद्या किरकोळ वादासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेला, तर नियम, कायदा, कारवाई सगळं पुस्तकातलं लागू. पण बेकायदेशीर धंदे करणारे? त्यांना तर “दूरून सिग्नल” दिला की गाडी चालूच. पोलिस गाडी आणि गुन्हेगारी गाडी दोन्ही एकाच ट्रॅकवर धावतायत, फक्त ड्रायव्हर बदलतो एवढंच.
ही वेळ गंभीर आहे — कारण भ्रष्टाचार दिसतोय, आणि लोक मात्र शांत आहेत.भीती आहे. तक्रार करण्याची हिम्मत नाही. पण हा मूकपणा एक दिवस विक्रीसाठी ठेवलेली कायदा-व्यवस्था कायमची नष्ट करेल.
राजगडचा भूगोल मजबूत आहे, इतिहास बलाढ्य आहे; पण जर या भूमीवर कायदा पैशासमोर गुडघे टेकत असेल, तर समाज कोसळायला वेळ लागणार नाही.
राजगडला गरज आहे पोलिसांची —पण पोलिसी वर्दीत व्यापार करणाऱ्यांची नाही.
लढायला लागेल, बोलायला लागेल —कारण आता वेळ आली आहे लोकशाही परत न्यायालयात नेण्याची… न्यायालय “खिशात” नव्हे.
